बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे मानले आभार
मुंबई, दि. १५ मार्च २०२५
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम गतिशक्ती’ योजनेअंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ८९व्या बैठकीत महाराष्ट्रातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे या मार्गावरील कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
या प्रकल्पाची एकूण लांबी ३२.४६० किमी असून, हा ब्राउनफिल्ड प्रकल्प मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि मालवाहतुकीच्या समस्यांवर उपाययोजना करेल. यामुळे बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत या महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी वाढ होणार आहे.
या पायाभूत प्रकल्पामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीच्या वेळेत लक्षणीय बचत होईल, तसेच स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळेल. हा प्रकल्प ‘पीएमजीएस एनएमपी’च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, विविध ठिकाणांदरम्यानच्या जोडण्या सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील रेल्वे सुविधांमध्ये क्रांतिकारक बदल घडून येणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे मी हार्दिक आभारी आहे.”
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाला नवीन दिशा मिळेल आणि प्रवासी आणि व्यापारी समुदायाला मोठा फायदा होईल.